Home अमरावती संविधानाच्या विरोधकांकडून संविधानाच्या अंमलबजावणीची अपेक्षा करणे व्यर्थ-राजकुमार जवादे

संविधानाच्या विरोधकांकडून संविधानाच्या अंमलबजावणीची अपेक्षा करणे व्यर्थ-राजकुमार जवादे

44

 

 

अमरावती (प्रतिनिधी) -भारतीय संविधान हा देशाच्या सध्याच्या राजकारणाचा सर्वात मोठा अजेंडा बनला आहे. मागील 75 वर्षात भारतीय संविधानातील मूळ भावना नष्ट करणे, संविधान रद्द करण्याची धमकी देणे आणि कुटील कारस्थान करून संविधानाचा अपमान करणे या प्रक्रियेत राज्यकर्ते आणि विरोधी पक्षनेते हे सारखेच दोषी आहेत. लोकसभा निवडणुकीत संविधान व लोकशाहीच्या नावाखाली एस सी, एसटी,ओबीसी, धार्मिक अल्पसंख्याक या समाजातील लोकांकडून मते मागितली परंतु अंमलबजावणी करताना चुप्पी साधायची हा कुटील डाव बहुजन समाजाने ओळखून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षनेते यांच्या कडून संविधानाच्या प्रामाणिकपणे अंमलबजावणीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे प्रतिपादन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी अमरावती येथे संपन्न झालेल्या बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या अमरावती विभागीय अधिवेशनात वर्तमान परिस्थितीत सामाजिक लोकशाहीचे भवितव्य या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

 

बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रथम अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, साप्ताहिक शालवन पत्रिकेचे संपादक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अमरावती विभागीय अधिवेशनाचे आयोजन अर्बन विलेज फ्यामीली रेस्टॉरंट सभागृह, शासकीय विश्रामगृह रोड अमरावती येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे माजी महासंचालक रमेश कटके म्हणाले की, वर्तमान परिस्थितीत लोकशाही टिकवायची असेल तर सर्व एस सी, एसटी ओबीसी धार्मिक अल्पसंख्याक या समुदायाने एकत्रीत येऊन आपली संघटन शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सिद्धार्थ सुमन म्हणाले की,1991 मध्ये कांग्रेस पक्षाने खाजगीकरण आणि उदारीकरण आणून येथील बहुजनांचे आरक्षण संपवले संविधानाच्या अंमलबजावणी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वबळावर सत्ता काबीज करणे गरजेचे आहे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या या अमरावती विभागीय अधिवेशनात मुंबईचे संजय मोहिले, पुणे येथील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव किसन थूल, वर्धा जिल्ह्यातील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, अकोला येथील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव नरेश मूर्ती, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा .डॉ. चरणदास सोळंके, राष्ट्रीय कोषाध्यक्ष हर्षद सोनोने सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई श्रीकृष्ण उबाळे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शेळके, मोहम्मद शफी सौदागर, कैलास सोनोने, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, धामणगाव रेल्वे येथील पुंडलिक मून, तिवसा येथील सरस्वतीताई गाडगे, अमरावती येथील विजय बसवनाथे इत्यादी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.

या अधिवेशनात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी असंख्य संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनाचे प्रास्ताविक बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे, संचालन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष प्रा अशोक ठवळे तर आभारप्रदर्शन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव प्रा. डॉ. रविकांत महींदकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here