✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.23जुलै):-माणमधील गंभीर दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाने वरकुटे-मलवडीसह परिसरातील गावांसाठी टेंभू योजनेचे पाणी सोडावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी कॅांग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केली.
सातारा जिल्ह्याला अॅारेंज अलर्ट असला,तरी माण तालुका कोरडाच आहे.एप्रिल-मे पासून दुष्काळाच्या झळा सोसणारी बहुतांश जनता जुलै संपत आला तरी टॅंकरवर अवलंबून असून आजही येथील जनतेला प्रचंड दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
माण पूर्वमधील वरकुटे मलवडी,बनगरवाडी,महाब्ळेश्वरवाडी,कुरणेवाडी,शेनवडी ग्रामपंचायतींनी टेंभूचे पाणी म.वाडी तलावात सोडण्याची मागणी मे मध्ये केली होती;परंतू पाणी सोडण्यात आले नाही.त्यामुळे या परिसराला प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलसंधारण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे टॅंकरने पाणीपुरवठा आणि चाराछावणी उभारणीसाठी शासनाचा कोट्यावधींचा खर्च होणार आहे.हा खर्च टाळण्यासाठी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी त्वरित वितरण व्यवस्थेद्वारे म.वाडी तलावात सोडावे,आवश्यक ठिकाणी टॅंकर सुरू करावेत,चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी अभयसिंह जगताप यांनी केली आहे.