Home गडचिरोली मराठी साम्राज्याची आधारशिला!

मराठी साम्राज्याची आधारशिला!

145

(शहाजी राजे भोसले स्मृतिदिन विशेष)

शहाजीराजे भोसले हे छ.शिवाजी राजे भोसले यांचे वडील आणि मालोजी राजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार हे मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कारकीर्दित निजाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले, तरी त्यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यांनी तसा दोनदा प्रयत्न केला, परंतु त्यास फारसे यश आले नाही. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र छ.शिवाजी राजे महाराष्ट्र आणि व्यंकोजी राजे तंजावर यानी प्रत्यक्षात आणले. ही ज्ञानवर्धक माहिती श्री एन. के. कुमार गुरुजी यांच्या भारदस्त शब्दांत जरुर वाचा… 

मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई- उमाबाई हिच्या पोटी सिंदखेड येथे शहाजींचा जन्म दि.१५ मार्च १५९४ रोजी झाला. शहाजी राजेंच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत नेहमीप्रमाणे मतभेद आहेत. बाबाजी राजे भोसले यांच्या घरात मालोजी राजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजी राजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजी राजेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजी राजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर सुगंधासारखी पसरत गेली.

मालोजी राजे भोसले हे आपला भाऊ विठोजी राजे भोसले यांचेसह सहकुटुंब सन १५७७मध्ये सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजी राजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स.१५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.

मुघल शहेनशाह औरंगजेब याने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाख सैन्यासह रवाना केले. सोबत आदिलशहा ८० हजार सैन्य घेऊन निघाला. शहाजी राजेंकडे २० हजार सैन्य होते. त्यातील १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून तेवढेच त्यांनी स्वतःकडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळग्रस्त असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजी राजेंनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीची काही कळण्यापूर्वीच वाताहात झाली. तेव्हा अनेक योद्धे शहाजी राजेंचे बंदी झाले आणि त्यांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत त्यांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गाव अहमदनगरपासून पंधरा किमी अंतरावर आहे. नंतर निजामशाही वजीर, फतेह खान, जहान खान यांनी निजामाला मारले आणि राजांना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषांना ठार करविले.

उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा राजांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून स्वतः कारभार हाती घेतला, जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ तीन वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.
दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८ हजार सैन्य निजामशाही व आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले; तेव्हा घाबरून आदिलशहा हा शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली.

बेंगलोर विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केम्पे गौडा १ यांचेद्वारे सन १५३७मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला सन १६३८मध्ये त्यांचा उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रानादुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली एक बड़ी आदिलशाही बीजापुर सेनाद्वारे बेंगलोरवर कब्जा केला गेला होता, ज्यांनी केंम्पे गौडा ३ यांना पराजित केले होते आणि बेंगलोरचे शाहजी यांना जहागिर- संपत्तीच्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता, तोही त्यांच्याकडेच ठेवला.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजी मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्यांना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले. राजांनी आपले पुत्र छ.शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. छ.शिवाजी राजांबरोबर बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्य कारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजी राजांनीच शिवरायांना दिली. छ.शिवरायांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजी राजांची यांस फूस आहे, या संशयाने आदिलशाहीने मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतेहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजी राजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले.

साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता दि.२५ जुलै १६४८चा. हे कळताच छ.शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजी राजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात, असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी, ही अट घातली. अशा प्रकारे छ.शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले, हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि.१६ मे १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा अफझलखानाची दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७ हजार फौज विजापूरबाहेर खडी ठेवली होती.

शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते, की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे असे- सन १६२५ ते १६२८- आदिलशाही, सन १६२८ ते १६२९- निजामशाही, सन १६३० ते १६३३- मुघलशाही, सन १६३३ ते १६३६- निजामशाही, सन १६३६ ते १६६४- आदिलशाही पुढे सन १६६१ ते १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ छ. शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच दि.२३ जानेवारी १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी जिल्हा दावणगिरी- कर्नाटक येथे बांधली.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे शहाजी राजेंना त्यांच्या पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन !!

✒️श्री एन. के. कुमार गुरुजी.गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here