✒️परभणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
परभणी(दि.8जानेवारी):- परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या पाचलेगाव या छोट्याश्या गावचे रहिवासी असणारे मयूर जोशी लेखक, कवी, कथाकार, गझलकार, समीक्षक, व्याख्याते आणि सदाबहार सूत्रसंचालक म्हणून सुपरिचित आहेत. मागील तीन वर्षापासून विविध वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिके यातून ते सातत्याने ललित लेख, कविता, पुस्तक समीक्षण लेख आणि कथा लिहीत आहेत.
काही वर्तमानपत्रात त्यांच्या लेखनाचे नियमित सदर सुरू आहे. मयूर जोशी यांची आत्तापर्यंत आसवांची स्पंदने (कथासंग्रह), भावस्पर्शी मयूर विचार (ललित साहित्य संग्रह), आणि यथार्थ (कवितासंग्रह) अशी बहुचर्चित असणारी आणि वाचकांना भावलेली तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे लेखन आवडीने वाचणारा मोठा वाचकवर्ग आहे.
नुकतेच त्यांना 3, 4, आणि 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे संपन्न होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा व्यासपिठावर कविता सादरीकरणासाठी संयोजन समितीने निमंत्रीत केले आहे. या मोठ्या व्यासपिठावर सादरीकरण करण्यासाठी त्यांच्या कवितेची झालेली निवड हा त्यांचा आणि त्यांच्या सकस, दर्जेदार लेखनाचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. याबद्दल त्यांचे विविध व्यक्ती, संस्था, आणि समूहांकडून अभिनंदन व सन्मान केला जात आहे.