✒️अनिल साळवे(गंगाखेड (प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.24डिसेंबर):-तालुक्यातील पडेगाव येथील साठे मधील १५० व फुले नगर मधील ५० कुटुंबियांना तहसीलदार गोविंद येरमे यांनी अतिक्रमण नोटीस पाठविल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्या नोटीसग्रस्त कुटुंबियांची गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
त्यावेळी आपल्या व्यथा सांगताना ‘त्या’ कुटुंबियांना अश्रु आनावर झाले. जेष्ठ नागरिक, अबावृध्द यांना आ.डॉ.गुट्टे यांच्या आधाराने धीर आला. त्यामुळे साहेब, पाठीवरती हाथ ठेऊन, नुसते लढ म्हणा ! अशा शब्दात ‘त्या’ कुटुंबियांनी आ.डॉ.गुट्टे यांना आर्त हाक दिली.
याबाबत सविस्तर वृत्त की,गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील साठेनगर व फुलेनगर हि फार जुनी वसाहत आहे. तेथील नागरिकांना शासनाने वीज, पाणी, रेशन तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्यामुळे तेथील नागरिक वर्षानुवर्षे रहिवासी आहेत.
दोन्ही नगर मधील नागरिकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे पक्की घरे बांधली आहेत. मात्र, सध्या त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम (५०)१ प्रमाणे तहसिलदार गोविंद येरमे यांनी अतिक्रमण नोटीस दिली आहे. त्यामध्ये आपली घरे शासकीय गायरान जमिनीवर उभी असून ते अतिक्रमण त्वरीत काढण्याचे सूचित केले आहे.त्यामुळे भयभीत झालेल्या ‘त्या’ २०० कुटुंबियांनी गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे व्यथा मांडली. परंतु आ.डॉ.गुट्टे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला होते. मात्र, अधिवेशनास
सुट्टी मिळताच आ.डॉ.गुट्टे यांनी तातडीने पडेगाव येथे उपस्थित राहून ‘त्या’ कुटुंबियांची भेट घेऊन घरांची प्रत्यक्ष पाहाणी केली. तसेच भयभीत नागरिकांची मायेने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
याप्रसंगी नागरिकांशी बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गायरान जमिन अतिक्रमणाचा विषय सध्या राज्यभर गाजत आहे. अनेक जिल्ह्यात नागरिकांना नोटीस दिल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवीन धोरणात्मक कायदा करण्याच्या विचारात आहे. तरीही वर्षानुवर्षे राहाणाऱ्या कोणत्याही नागरिकांना असे बेघर करता येणार नाही. मी तुमच्या सोबत आहे. आपण मिळून हि लढाई लढू आणि जिंकू सुध्दा.
यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, युवा तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, रासप तालुकाध्यक्ष शेषराव सलगर, सचिन नाव्हेकर, राजेभाऊ सातपुते, महेश आप्पा शेटे, भास्कर ठवरे, उद्धवराव चोरघडे, प्रल्हादराव शिंदे यांच्यासह तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांचे धीराचे शब्द ऐकून आनंदीत झालेल्या ‘त्या’ कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.तर ताडकळस प्रमाणे हा विषय मार्गी लागेल?काही महिन्यांपूर्वी ताडकळस येथील सैनिक नगर व बालाजी नगर येथील घरांना पूर्णा तहसीलदार यांनी नोटीस दिल्या होत्या. मात्र त्यानंतर आ.डॉ.गुट्टे यांनी आक्रमक होऊन थेट महसूलमंत्री ना.विखे-पाटील यांच्या दरबारात हा विषय मांडला होता. त्यानंतर ताडकळसच्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे पडेगावकरांनाही तसाच दिलासा मिळेल का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.